विराट शिवाय कसोटी क्रिकेट अर्धवटचं!   

नवी दिल्ली : अनेक वर्ष क्रिकेटवर राज्य करणार्‍या विराट कोहलीने सोमवारी कसोटीतून निवृत्ती जाहीर केली आहे. अलिकडेच रोहित शर्माने कसोटीतून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर आता विराटही कसोटीतून निवृत्त झाला. त्यामुळे भारतीय संघाला एकापाठोपाठ दुसरा धक्का बसला. विराट कोहलीच्या कसोटी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरूवात २०११ मध्ये कसोटीत पदार्पण केले होते. तेव्हापासून आतापर्यंत त्याने भारतासाठी १२३ कसोटी सामने खेळले आहेत. दरम्यान विराटने २१० डावात ४६.८५च्या सरासरीने फलंदाजी करताना ९,२३० धावा केल्या आहेत. कसोटीतील त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद २५४ राहिली आहे. कसोटीमध्ये त्याने ३१ अर्धशतकांसह ३० शतके आणि ७ द्विशतके झळकावली आहेत. त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध ३ जानेवारी २०२५ मध्ये शेवटची कसोटी पारी खेळली होती.
 
विराटने गेल्या वर्षीच भारताने टी२० विश्वचषक जिंकल्यानंतर टी२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. आता तो कसोटीतूही निवृत्त झाला. भारतीय संघ जून महिन्यात इंग्लंड दौर्‍यावर असेल. यादरम्यान भारत-इंग्लंड संघात ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. आता भारतीय संघ कमी अनुभवी खेळाडूंसह इंग्लंड दौर्‍यावर असणार आहे. विराटचा फिटनेस पाहता तो भारतासाठी आणखी बराच काळ कसोटी खेळू शकला असता.
 
रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर विराट कोहलीनेही कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, येत्या जून महिन्यात भारतीय संघ ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी इंग्लंड दौर्‍यावर जाणार आहे. हा दौरा पाहता बीसीसीआयने त्याला आपल्या निर्णयावर फेरविचार करण्याची विनंती केली होती. मात्र, विराट आपल्या निर्णयावर ठाम राहिला. अखेर सोमवारी त्याने १४ वर्षांच्या कसोटी कारकिर्दीला पूर्णविराम दिला आहे. विराटच्या निवृत्तीनंतर अनेक दिग्गज खेळाडूंनी त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 
 
विराटच्या षटकारांची संख्या थक्क करणारी
 
कसोटीत षटकार मारण्याच्या बाबतीत कोहली १५ वा भारतीय खेळाडू आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की हरभजन सिंग विराट कोहलीपेक्षा पुढे आहे. कोहलीने त्याच्या १४ वर्षांच्या कारकिर्दीत १२३ कसोटी सामने खेळले आणि ९२३० धावा केल्या. विराट कोहलीने त्याच्या कसोटी कारकिर्दीत एकूण ३० षटकार मारले आहेत.
 
कसोटीमध्ये १० हजार धावांचा टप्पा अपूर्णच
 
विराटने त्याचा कसोटी करिअरमध्ये अनेक विक्रम त्याच्या नावावर केले आहेत. विराट कोहलीने १२३ कसोटी सामन्यांमध्ये ४६.४५ च्या सरासरीने ३१ अर्धशतक आणि ३० शतकांसह ९२३० धावा केल्या. पण कसोटीत १० हजार धावांचा टप्पा गाठण्याचं विराटचं स्वप्न असल्याचं त्याने सांगितलं होतं. त्याला कसोटीत ही स्वप्नवत कामगिरी पूर्ण करण्याकरता ७७० धावांची गरज होती.
 
१२ वर्षांपूर्वीच्या मुलाखतीत विराट कोहली म्हणाला होता, मी रेकॉर्ड्सवर लक्ष ठेवत नाही. मी जेव्हा एखाद्या सामन्यात शतक करतो, त्यानंतर मला कळतं की मी सर्वात जलद १० शतकं करणारा खेळाडू ठरलो आहे. त्यामुळे सामना झाल्यानंतर मला हे सर्व विक्रम कळतात. सामन्याआधी माझं लक्ष अशा गोष्टींवर नसतं, की माझ्याकडे ५ शतकं करण्यासाठी ३ डाव बाकी आहेत, मग मी रेकॉर्ड करेन. मी असा विचार करत नाही. माझं लक्ष्य कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावा करण्यावर आणि हा असा विक्रम आहे जो मला गाठायचाच आहे. असेही तो म्हणाला होता.
 
गेल्या ५ वर्षांमध्ये विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी निराशाजनक ठरली यामुळेच विराट १० हजार कसोटी धावांचा टप्पा गाठण्यात अयशस्वी ठरला. विराटच्या आधी कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये १० हजार धावा करणारे फक्त सात फलंदाज आहेत. भारतीयांमध्ये आतापर्यंत तीन फलंदाजांनी कसोटीत १० हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. यामध्ये सचिन तेंडुलकर (१५,९२१), राहुल द्रविड (१३,२८८) आणि सुनील गावस्कर (१०,१२२) यांचा समावेश आहे.
 
१४ वर्षांची भव्य कसोटी कारकिर्द 
 
३६ वर्षीय विराट कोहलीने कसोटी करिअरची सुरुवात २०११ मध्ये केली आणि त्याने त्याच्या १४ वर्षांच्या मोठ्या कसोटी करिअरमध्ये खूप रेकॉर्ड तोडले आहेत.कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून विराट कोहलीने सर्वात जास्त शतके झळकावली आहेत. त्याने ६८ कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. ज्यामध्ये त्याने २० डावात शतक झळकावले आहे. कर्णधार म्हणून सर्वात जास्त कसोटी शतक झळकावणार्‍या खेळाडूंच्या यादीत विराट पहिल्या क्रमांकावर आहे.
 
विराट कोहलीने कसोटी फॉरमॅटमध्ये कोणत्याही भारतीय द्वारे सर्वात जास्त डबल शतक झळकावण्याचा कारनामा केला आहे. त्याने १४ वर्षांच्या रेड बॉल करिअरमध्ये ७ डबल सेंचुरी झळकावली आहे. त्याचं शेवटचं डबल शतक २०१९ मध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध आलं होतं. सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग दोघांनीही कसोटी क्रिकेटमध्ये ६-६ डबल शतक झळकावली आहेत.
 
विराट कोहलीने सौरव गांगुली, मोहम्मद अझरुद्दीन आणि एम एस धोनीसारख्या कर्णधारांना मागे टाकले आहे. विराट कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा सर्वश्रेष्ठ यशस्वी कर्णधार ठरला. त्याच्या अंतर्गत टीम इंडियाने ६८ कसोटी सामन्यांमध्ये ४० विजय प्राप्त केले. त्याच्या नेतृत्वात भारताचा विजय ५८.८२% राहिला आहे.विदेशी कसोटी दौर्‍यावर ४ शतक झळकावणारा विराट कोहली पहिला खेळाडू आहे. त्याने २०१४-१५ मध्ये ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर ४ शतक झळकावले होते. याशिवाय २०१६-१७ इंग्लंड मालिकेत सुद्धा त्याने ४ शतकी पारी खेळल्या होत्या.कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहली चौथ्या स्थानावर सर्वात जास्त धावा करणारा खेळाडू राहिला. त्याने १२३ कसोटी सामन्यांच्या करिअरमध्ये ९,२३० धावा केल्या. या यादीत त्याच्या वरती फक्त सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सुनील गावस्कर राहिले आहेत.
 
बीसीसीआयची प्रतिक्रिया...
 
विराटने कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर बीसीसीआयची प्रतिक्रिया समोर आली आहे. थँक्यू विराट कोहली. कसोटी क्रिकेटमध्ये एका मोठ्या युगाचा शेवट झाला, पण तुझी खेळी कायमच स्मरणात राहील.
 
सचिन तेंडुलकरची हृदयस्पर्शी पोस्ट!
 
तुमची कसोटी कारकीर्द किती अद्भुत होती! तुम्ही फक्त भारतीय क्रिकेटला धावा दिल्या नाहीत तर तुम्ही त्याला उत्साही चाहते आणि खेळाडूंची एक नवीन पिढी दिली आहे. खूप खास कसोटी कारकिर्दीबद्दल अभिनंदन. प्रेरित करण्यात आहे.
 
अनुष्का शर्माची खास पोस्ट...
 
सगळेजण तुझ्या विक्रमांबद्दल, अचिव्हमेंट्सबद्दल बोलतील, परंतू तुझ्या डोळ्यात आलेले परंतू न दिसलेले अश्रू आणि तू लढलेली एक-एक लढाई मला नेहमी आठवेल. तुझे क्रिकेटच्या कसोटी प्रकाराबद्दल असलेले प्रेम मला माहित आहे. मला माहित आहे की कसोटी क्रिकेटने तुझ्याकडून काय काय घेतलंय. प्रत्येक कसोटी मालिकेनंतर तू अधिक प्रामाणिक, अधिक समजूतदार मला वाटला. तुझ्यात होणारे हे बदल पहाणे चांगली गोष्ट होती. मला नेहमी वाटायचं की तू कसोटीतून निवृत्त होशील परंतू तू कायम तुझ्या मनाचं ऐकलं. तू सर्वकाही कमावलं आहेस विराट.

Related Articles